📰 ब्रेकिंग न्यूज | राजगुरूनगर (खेड)
डाक बंगल्यातील कथित अनधिकृत दर्ग्याविरोधात आंदोलन; सरपंच नरेंद्र वाळुंज यांचा लढा तीव्र
राजगुरूनगर (प्रतिनिधी) :
खेड तालुक्यातील राजगुरूनगर येथील शासकीय विश्रामगृह (डाक बंगला) परिसरात उभारण्यात आल्याचा आरोप असलेल्या अनधिकृत दर्ग्याच्या विरोधात सरपंच नरेंद्र वाळुंज यांनी शिवशंकर स्वामी यांच्या मदतीने जोरदार लढा उभारला आहे.
या प्रकरणाच्या गांभीर्याची दखल घेण्यासाठी सरपंच नरेंद्र वाळुंज आणि शिवशंकर स्वामी यांनी सातारा येथे राज्याचे बांधकाम (PWD) विभागाचे कॅबिनेट मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी संबंधित प्रकरणाची सविस्तर माहिती मंत्री महोदयांसमोर मांडण्यात आली.
शासकीय जागेवर होणारी अतिक्रमणे ही केवळ कायद्याचा भंग नसून शासन व्यवस्थेलाच दिलेले उघड आव्हान असल्याचे सांगत या प्रकरणात तातडीने कठोर कारवाई करण्याची ठाम मागणी करण्यात आली. मंत्री महोदयांनीही विषयाची गांभीर्याने दखल घेत सकारात्मक चर्चा केली असून लवकरच योग्य ती कार्यवाही होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
दरम्यान, शासकीय संपत्तीचे संरक्षण, कायद्याचा सन्मान आणि अन्यायाविरोधातील भूमिका कायम ठेवणार असल्याचे सरपंच नरेंद्र वाळुंज तसेच मानद प्राणी कल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी स्पष्ट केले.



